Wednesday, September 16, 2009

पाझर तलाव

तिने चिडून एकदा मला
संबोधले--- "अरे दगडा,
कधी तरी पाझर फुटू देत की प्रेमाचा!"

आता दगडाला खरंच पाझर फुटायचा
म्हणजे केवळ अशक्य---
पण तुला असं पटवून द्यायचं असेल,

तर अगदी मनापासून म्हणतो,
"जरी मी दगड वाटलो तुजला,
प्रिये भासतेस भारी दगडफूल तू मला"


Thursday, July 02, 2009

एका सेतूची नामकहाणी

अडवाणीजींनी भेट दिलेल्या आपल्या (१९९२ सालच्या, किरकिरत्या टोयोटा) अग्निरथातून स्वा. सावरकर चालले होते. सकाळी अडवाणींसोबत "रामसेतूचे सांस्कृतिक महत्त्व आणि चिंतन" ही चर्चा चांगलीच रंगली होती, तेच विचार अजून त्यांच्या मनात घोळत होते. तेवढ्यात वरळी नाक्याच्या ट्रॅफिकच्या कोलाहलामुळे ते एकदम बिचकले -
"काय हो चालक - स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षं झाली ना? अजूनही चळवळी चालूच? एवढी कसली गर्दी जमली आहे?"
"क्या साब... पहली बार बंबई आये लगता है. इसको ट्रॅफिक बोल्ते है. रोज का मामलाये"
तेवढ्यात अचानक शिवसैनिकांचा एक मोर्चा आला - "हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे सुपुत्र, स्वतंत्रता संग्रामाचे सेनानी स्वा. सावरकर ह्यांचेच नाव समुद्रसेतूला द्यायला हवे". आधीचा तासभर विविध सोम्या-गोम्यांच्या (आणि त्यांच्या काकांच्या) वाढदिवसाचे, पक्षांतर्गत नेमणुकांचे आणि दहावी उत्तीर्णांच्या अभिनंदनाचे फलक पाहून हबकलेल्या सावरकरांना एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातदेखील आपल्या नावाचा उच्चार झाल्याचे ऐकून मोद झाला. हे हिंदुह्रुदयसम्राट आणि त्यांचे सुपुत्र ह्यांची ताबड्तोब भेट घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते चालकाला म्हणाले,
"अहो हे हिंदुह्रुदयसम्राट कुठे राहतात?"
"वो तो बांद्रा मैं रहते साब..... उधर जाना क्या?"
"हो. ताबडतोब भेटलेच पाहिजे त्यांना!"
"ट्रॅफिक बहुत रहता है साब - सावरकर रोड पे, शिवाजी पार्क के पास."
आपल्या नावाचा रस्तादेखील आहे हे ऐकून खूष झालेले स्वातंत्र्यवीर तिथेही खोळंबा असल्याचे ऐकून थोडे वैतागले.
"आप बोले तो नये ब्रिज से ले लूं? पचास रुपया ज्यादा लगेगा"
ब्रिज म्हणजे बहुदा तोच घोषणांतला समुद्रसेतू असावा असे त्यांनी ताडले.
"एकदम नया है, दस साल से बन रहा है"
पन्नास रुपये ही अंमळ जास्तच रक्कम असली तरी वेळ वाचेल म्हणून त्यांनी गाडी तिकडे वळवायला सांगितले.

समुद्रसेतूवर पोचतापोचताच अजून अर्धा तास निघून गेला. सेतूच्या मध्यावरून मुंबईचे विहंगम दृष्यसुद्धा पाहून झाले. अजून उशीर व्हायला लागला तसे स्वातंत्र्यवीर रथातून उतरले. सर्वदूर गाड्याच गाड्या पाहून त्यांना एकदम कोंडल्यासारखे वाटले. तास-दोनतास तरी काही सुटका नाही अशी चिन्हं दिसायला लागली तेव्हा स्वातंत्र्यवीरांची चलबिचल सुरू झाली. अंदमानचा अनुभव आणि जरा वय झाले तरी बांद्र्यापर्यंतचे २-३ किमी आपण सहज पार करू हा त्यांना आत्मविश्चास होता. ’सागरा, प्राण तळमळला’ असं म्हणत त्यांनी अरबी समुद्राच्या काळ्या पाण्यात स्वतःला (स्वातंत्र्यसमरात झोकून द्यावं तसं) झोकून दिलं आणि ते बांद्र्याच्या दिशेने पोहू लागले. ट्रॅफिकच्या अशा आधुनिक ’कारा’गृहाला आपले नाव नकोच नको असे सेनाप्रमुखांना सांगायचे अशी त्यांनी मनोमन खूणगाठ बांधली.

****
आपल्या नजरेसमोर एका वयोवृद्ध माणसाने समुद्रात उडी मारलेली पाहून राजीव गांधी एकदम चकित झाले. बांद्र्याच्या टोल नाक्याहून अंमळ फर्लांगभर पुढे येऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मोटारीतून तत्काळ पायउतार होऊन ते चटकन त्या दिशेने बघू लागतात तोच त्यांच्या अनंत सुरक्षारक्षकांनी, गनिमांनी प्रतापगडाला घालावा तसा त्यांना वेढाच घातला. लगोलग मागल्या-पुढल्या गाड्यांतून विविध मंत्री, खासदार, आमदार उतरले. इतक्या भारदस्त असामींच्या एकत्र पावलांमुळे राजीवजींना आपल्या नावाचा सेतूही क्षणभर हलल्यासारखा वाटला. पंचायती राजच्या अवलंबनानंतर काही वर्षांतच राजकीय शक्ती समाजाच्या (नैतिक) तळागाळापर्यंत पोचली आहे हे पाहून मनोमन तेही हलले.

(गाळात गेलेल्या) महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यातल्या त्यात कमी खाणारे असल्याने, धावत धावत सगळ्यांत आधी राजीवजींजवळ पोहोचले.
"क्या हुआ राजीवजी?"
"हमने देखा की एक आदमी अभी-अभी समंदर में कूद गया! क्या आप के राज्य मैं अभीभी खुदकुशी का सिलसिला जारी है?"
एकदम गुगली आल्याने बावरलेल्या चव्हाणांना (क्रिकेटचे सर्वेसर्वा असलेल्या) कृषीमंत्री पवारांनी सावरले---
"नहीं नहीं! बारिश थोडी देर से आयेगी लगता है, लेकिन उससे पहलेही हमारी सरकारने पॅकेज जाहीर किया है, तो खुदकुशीका मामला नहीं हो सकता. कोई तैराती वाला खिलाडी होगा" शरदचंद्रांनी आपले हिंदी पाजळले.
पवारांना आय-पी-एल च्या खेळाडूंना मिळालेल्या (आणि विविध देणगीदारांकडून निवडणुकांनिमित्त घेतलेल्या) फायनॅन्शिअल पॅकेजच्या शिवायही काही माहीत आहे हे पाहून राजीवजी जरा खूष झाले. त्यांनी फर्मान काढले:
"चव्हाणजी, आप यहॉंपर सुरक्षा का ऐसा प्रबंध करें ताकी आयिंदा यहॉंसे कोई कूद ना पाये."
मूकपणे मान डोलवणाऱ्या चव्हाणांना बाजूला सारून राजीवजी पुढे चालू लागले. विपुल प्रमाणात खर्च करून उभारलेला, आपले नाव उंचावणारा, भारताचे तंत्रकौशल्य सिद्ध करणारा दिमाखदार पूल निरखत, विविध (राष्ट्रवादी, परराष्ट्रवादी आणि इतर) कार्यकर्त्यांमधून वाट काढत राजीवजी जरा पुढे येतात तोच "मुंबईच्या समुद्रसेतूला भूमीपुत्राचेच नाव हवे" असा मोर्चा त्यांच्याकडे येताना दिसला.

आपला जन्म मुंबईचा असल्याने हे नवीन पाठीराखे कोण आले ते बघणाऱ्या राजीवजींच्या सुरक्षारक्षकांनी संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन इतका वेळ वर घोटाळणारे हेलिकॉप्टर जरा खाली घेऊन त्यातून दोरी सोडली. राजीवजींनी ती धरून लगेचच वर चढण्य़ास सुरुवात केली. खाली सुरु होऊ घातलेली (घोषणांची) तुफान लढाई टाळून ते हेलिकॉप्टरमध्ये शिरले. आकस्मिक राजकीय प्रवेशानंतर पहिल्यांदाच मिळालेली संधी साधून त्यांनी हेलिकॉप्टरचा ताबा घेतला आणि ते नरीमन पॉईंट कडे वळवले. तेवढ्यात हेलिकॉप्टरच्या दिशेने एक तोफगोळा भिरभिरत आला....

****
दूर समुद्रातून आपल्या तोफगोळ्याचा ह्या उडणाऱ्या यंत्रावरचा नेम हुकलेला पाहून कान्होजी आंग्रे नाराज झाले. ह्या महाकाय पुलावर काय धुमश्चक्री चालली आहे ते पाहण्यास त्यांनी आपल्या नावा तिकडे हाकल्या.

"हरहर महादेव!" एकदम अशा आरोळ्या आलेल्या ऐकून आधुनिक सेनेचे नवकार्यकर्ते भांबावून गेले. ख-याखु-या तोफा आणि खरेखुरे मावळे समोर आल्यावर त्यांची पाचावर धारण बसली. आपल्या राजपुत्र-कम-(नव)सेनापतीला एकाकी सोडून त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या.
"काय रे, काय चालू आहे इथे? माझे दोन तोफगोळे वाया गेले ना" एव्हाना कान्होजी नांगर टाकून एका घोरपडीच्या मदतीने पुलावर चढून आले होते.
"क्षमा असावी दर्यावर्दीश्रेष्ठ!"
"ए काय रे, श्या देतोस मला?" कान्होजींना ही नवमराठीतली उपाधी रूचली नाही.
"तसं नाही आम्ही या पुलाला आपले नाव द्यावे अशी मागणी करायला जमलो होतो."
"आमचे नाव? आणि या पुलाला? कशाला?"
"महाराजांच्या महाप्रचंड महाआरमाराचे नेतृत्त्व करणा-या महाशूराचा हा योग्य महासन्मान ठरेल असं आम्हाला दिलसे, जानसे आणि मनसे सुद्धा वाटतं" (राज) की बात एका सैनिकाने सांगितली.
"आमचा काय सन्मान करायचा तो महाराजांनी केलाच की. आता तुमच्यासारख्या महाभागांकडून आम्हाला असलं काही नको!"
"हो! आमचंही म्हणणं असंच होतं--- म्हणून आधुनिक स्वातंत्र्यवीराचं, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राचं नाव आम्ही सुचवत होतो" ज्युनिअर ह्रुदयसम्राट बोलले.
"तसंच काही नाही, आमच्या थोर पूर्वजांनी मिळवलेल्या स्वातंत्र्य सुराज्यात बदलणा-या, मुंबईच्या पुत्राचं नाव द्यावं असं आम्ही म्हणत होतो!" घड्याळाचा टोला पडावा तसे कृषीमंत्र्यांचे एक चेले म्हणले.
"पूर्वी आम्ही मोगलांशी लढलो - अन्याय करणा-या जुल्मी बादशहाविरुद्ध रक्तं सांडलं. आता काय तुम्ही एकमेकांवरच अन्याय करताय की काय? काय एकेक लढतोय, वा!" इनका कुछ खरा नाही या आविर्भावात डोकं हलवून कान्होजी कडाडले.
"हे आम्ही चाललो. महाराजांचा विजय असो!"
इतकं बोलून कान्होजीं पुन्हा आपल्या जहाजाकडे निघाले.

"अहो पण मग या पुलाच्या नावाचा प्रश्न सोडवायचा कसा???"
"आधी या भयंकर रहदारीचा प्रश्न सोडवा. बघा किती माणसं अडून बसली आहेत. महाराजांच्या काळात असं नव्हतं. असं राह्यलं असतं तर मोगलांशी लढायला महाराज पोचलेच नसते. सगळी घोडी तिथेच अडली असती. काय कळलं??"

आजूबाजूच्या जनतेने "पॉ पॉ!!!" हॉर्नच्या आवाजांनी कान्होजींना अनुमोदन दिले. तेव्हा कुठे इतका वेळ रस्त्याच्या बरोबर मधे झोपा काढत असलेल्या राजकारण्यांना जाग आली.

****
दूर बांद्र्याच्या किना-यावर आत्ताच पोचलेले स्वा. सावरकर, हेलिकॉप्टरमधून दक्षिण मुंबईत पोहोचलेले राजीवजी आणि अरबी समुद्राच्या खोल पाण्यात पोहोचलेल्या नौकेचे शूरवीर कप्तान या सगळ्यांनी एकाच वेळी हुश्श केलं. आणि साधारण त्याच सुमारास इतका वेळ आपल्या अंगावर झेललेला ट्रॅफिक मोकळा झाला हे पाहून आपल्या मुंबईच्या सी-लिंकने सुद्धा!


-अजित ओक आणि मिहिर महाजन

(क्षमस्व: तंबी दुराई)

Wednesday, May 13, 2009

दम’दाटी’!

काल आमची हो.ही.* म्हणाली, "अरे हो, सांगत्येय, जरा दम धर!". आम्हाला अगदी म्हणजे अगदी रहावलं नाही. उत्तरलो, "हो, आता तू दम दिलास ना, मग (तो) धरायलाच पाहिजे!"

मराठीतल्या अशाच चित्रविचित्र वाक्प्रयोगांमुळे आपली भाषा इतकी मजेदार झाली आहे.

एका दमात असे काही शब्द आठवले मग एकदम लिहून काढावसं वाटलं!
- दमडी
- मुकादम (न बोलता दम भरणारा अधिकारी!)
- खायचा दम, द्यायचा दम, भरायचा दम
- नल आणि दमयंती!
- मदमस्त :-)
- दुर्दम्य

तुम्हाला सुचतंय का आणि काही?

---
हो. ही.: "होणारी ही"!

Sunday, May 03, 2009

चिकट विनोद!

फणस कापणे म्हणजे केक कापण्याइतकी सोप्पी गोष्ट नाही. 

हम केक खाने के लिये पेक्षा, हम गरे खाने के लिये किधर भी जा सकते है, यात जास्त निर्लज्जपणा आहे असे आम्हाला वाटते. ज्यांनी स्वतः फणस कापला आहे (किंवा प्रयत्न केला आहे) त्यांना आमचं म्हणणं नक्की पटेल. बाहेरचे काटेरी दात बाजूला करून  मुद्याला हात घालायचा; सुरीला तेल चोपडून तसंच घमघमाटात (तेलाच्या नव्हे, ग-यांच्या) एकेका ग-याची गच्ची पकडून त्याला चिकाच्या बंधनातून मुक्त करणं म्हणजे काही सोपं नाही! नुसत्या आठवणींनी थर’काप’ उडतो. अगदी ‘काप’रं भरतं, तुम्हाला सांगतो!

सुरी चालवण्यात सर्जनचा हात कोणी धरू शकत नाही असं म्हणतात (सर्जन सुरी चालवत असताना त्याचा हात कुणी धरूही नये म्हणा!). त्याच सर्जनला आमचं खुलं आव्हान आहे की फटाफट एक फणस कापून दाखवावा. बक्षीस म्हणुन बरका फणसाचे गरे मिळतील कापा! (सॉरी, बक्षीस म्हणून कापा फणसाचे गरे मिळतील बरंका!)

तर मुद्दा असा की फणस कापण्यापेक्षा तो खाणं, ही सोप्पी गोष्ट असावी. फणस कापणारा गडी जर तरबेज नसेल तर मग ग-यांना फणसाचा चीक चिकटून बसतो. मग चवीचवीनी गरे खाताना जर जीभ त्या चिकाच्या सापळ्यात अडकली, तर त्यालाच "टंग इन चीक" विनोद म्हणत असावेत...

हा विनोद रुचला नसेल, आणि त्यामुळे डोकेदुखीसद्रुष आजार बळावला असेल तर कायदेशीर मार्गानी या‘चिका’ दाखल करावी ही नम्र सूचना! आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवेपर्यंत ‘चिका’र याचिका दाखल झाल्या असतील, तेव्हा लाजू नका :-)

Thursday, January 29, 2009

दोन वाटा

वाटचुकार वासराशिवाय फिरकलेले कोणी नसते
अशा जागी गेली वाट सरत सरत आली असते
तिथे पुन्हा दोन वाटा फुटलेल्याच्या खुणा दिसतात
एक जरा सरावलेली दुसरीवरती ठसे नसतात
तिने चाहूल नाही म्हणून पाऊल पाऊल ओढून नेले
सोडून दिल्या वाटेकडे फिरून फिरून पाहू दिले
किती वेळ दिसत होती धरली नाही तीच वाट
तिची वळणे हेलकावे तिचे उतार तिचे घाट
तिनेच गेलो असतो तर ही कदाचित मिटली असती
तसे व्हावयाचे नव्हते - हीच माझी वाट होती!


कवि अनिल

रॉबर्ट फ्रॉस्टच्या The Road Not Taken वरून स्फूर्ती घेऊन ही दशपदी कवि अनिलांनी लिहिली असावी! काय अनन्यसाधारण प्रतिभा सांगावी!!

Wednesday, December 03, 2008

मी... शेतकरी!

फार म्हणजे फार जुनी काही गोष्ट नाही. आठवी-नववीत असेन तेव्हाची. मोठेपणी तुला काय व्हायचे आहे इत्यादी प्रश्नांचा ब-यापैकी अर्थ कळतो असं ते वय असावं. अर्थात प्रश्नाचा फक्त अर्थच कळतो, नेमकं उत्तर मात्र ठाऊक नसतं असं ते वय (म्हणजे अजुनही सापडलंय की नाही ते माहित नाही, असो); पण मुद्दा तो नाही. त्यावेळी तो प्रश्न कुणी seriously विचारला असता, तर माझं उत्तर अगदी तयार होतं --- शेतकरी!

अगदी पाचवी-सहावीत असल्यापासून शेतावर जाण्याच्या आठवणी अगदी पक्क्या आहेत. शनिवार किंवा रविवारी दुपारी, ढगाळ हवेत, किशोर कुमारच्या जुन्या गाण्याची कॅसेट गाडीत ऐकत किती तरी वेळा मी बाबांबरोबर आमच्या अंजनेरीजवळच्या शेतावर गेलो आहे. सगळीकडे भाताची हिरवी हिरवी शेतं, त्यांत डोक्यावर इरलं घेऊन राबणारे शेतकरी, बांधावर उगीच चार बाभळीची किंवा कडूनिंबाची झाडं, हात जरा वर केला तर हातात ढग येतील असं भरून आलेलं आकाश-- त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर वर्षानुवर्षे हा सीन अगदी नेमानं, तसाच्या तसा घडत आलेला आहे. निसर्गाला याहून चांगलं स्क्रीप्ट अजून तरी सुचलेलं नाही! त्या वळणावळणाच्या रस्त्यावर महिरावणीजवळ दुथडी भरून वाहणारी नदी लागायची, एकेक करत ती छो्टी-छोटी हिरवी गावं मागे पडायची, आणि लांब समोर ढगांनी पांघरूण घातलेला त्र्यंबकचा डोंगर दिसायला लागायचा. डाव्या बाजूला नाणे संशोधन संस्थेची इमारत ओलांडून पुढे गेलं की लगेचच उजव्या बाजूला बेजे गावाकडे जाणारा रस्ता लागतो-- त्याच रस्त्यावर आमचं शेत!

अठरा एकरांवर पसरलेलं ते शेत म्हणजे "तीर्थ"क्षेत्रच होतं, म्हणजे फक्त पावसाळ्यात :-). एका बाजूला जुनी विहिर, त्यावर झुकलेलं चिंचेचं झाड-- पाणीपुरवठा समितीचा हा एकमेव asset! कालांतराने मग वरच्या अंगाला अजून एक विहिर खणली. विहिरीच्या बाजूनी भाताची सलग तीन-चार आवणं. वरच्या बाजूला टोमॅटोच्या रांगा (टोमॅटोला "तांबाडे" यापेक्षा सार्थ दुसरं नाव नाही मराठीत!) या सगळ्यांच्या सोबतीला शेडच्या जवळपास मग कुठे थोड्या मिरच्या, वालाचे वेल, थोडी पालेभाजी इत्यादी लागवड असे. प्रमुख उत्पादन म्हणजे भात आणि तांबाडेच. जागा, हवामान आणि उत्साह यांचा अंदाज घेऊन मग भूईमूग, उडीद आणि खुरासणी टाकली जायची. खुरासणी(किंवा कारळं)चं तेल काढतात. तेल काढून उरलेल्याची मग चटणी असायची. शेतावरच्या वालाची भाजी आणि एका पोळीत कारळ्याची चटणी मी अनंत वेळा डब्यात नेली आहे - विशिष्ट पदार्थ आणि स्थळांशी निगडीत अशा कितीतरी आठवणी घट्ट होतात - मजा आहे!

दिवाळी होऊन गेली, की 'निळी' भाताची आवणं पिवळी पडायला लागतात. आवणात अजूनही पाणी असेल आणि दाणा भरला असेल तर आवणाच्या बाजूला उभं राहून तो भाताचा सुगंध तासंतास अनुभवावा. "औंधा पाणी बराबर पडलं अन उतारा कसा बेस आलाय," याचा आनंद तिथे कसणा-या आमच्या संतूकाका आणि इतर मंडळींच्या डोळ्यांतून बघत रहावा. भाताच्या कापणीची आणि नंतर तो झोडपायची तयारी होते. वीस-वीस पंचवीस-पंचवीस मजूर रोजगारीवर बोलावले जातात. आवणा-आवणांतून पिवळं पडलेलं ते सोनं मग त्या छोट्या शेडच्या पुढ्यात आणून टाकलं जातं. झोडपून मग हिरव्या-पिवळ्या सालासकट तांदळाचा दाणा वेगळा केला जातो. हवेवर टाकून कचरा वेगळा होतो. बारदानात भरून एकामागून एक पोत्यांची गणना होते. अनपेक्षित पावसापासून संरक्षण म्हणून ती पोती आतल्या खोलीत आणि उरलेली ताडपत्री टाकून नीट रचून ठेवली जातात. काळ्या मातीत उगवलेलं ते सोनं अशा त-हेने तिजोरीत जमा होतं. भाताच्या उरलेल्या काड्यांचे व्यवस्थित ढिग करून ठेवले जातात. त्यावर पोरांचं खेळणं सुरू होतं - मनसोक्त खेळून झाल्यावर केसांत अडकलेली तुसं आणि अंगाला सुटलेली खाज या पोरांच्या तक्रारींकडे आया दुर्लक्ष करतात.

आमच्याच काय, आजूबाजूच्या सगळ्यांच शेतांत हे असंच नाट्य घडत असणार! वर्षानुवर्षं!

पावसाच्या पाण्यावर आणि क्रमेणं निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेली ही भातशेती प्रत्येक वर्षीच असं मोलाचं पीक देते असं होत नाही. अतिपाऊस किंवा दुष्काळाचा चटका कधी बसेल सांगता येत नाही. कधी रोग पडतो - कधी उंदीर भाताच्या मुळावर ताव मारतात - एक ना दोन - नैसर्गिक संकटं ही अशी पाचवीचीच पुजलेली. तांबाड्यांचही तसंच - उत्तम पीक आलं तर भाव कोसळणार - आणि पीक नाही म्हटल्यावर उत्तम भाव मिळत असूनही त्याचा काय उपयोग!

वर्षामागून वर्षं सरली - एका पावसाळ्यानंतर दुसरा येऊन गेला - अंजनेरीजवळ, बेजे गावाकडच्या वाटेशेजारी ही शेतजमीन तशीच्या तशी अजूनही उभी आहे. बैल जाऊन ट्रॅक्टर आले, डिझेल पंपाची जागा वीजेच्या मोटारींनी घेतली - भातानंतर रब्बीच्या गव्हाची पीकं घेणं सुरू झालं, लहान आंब्यांची कलमं मोठी झाली, डझनावारी आंबे येऊ लागले - कालांतराने मीही मोठा  झालो - माझं शेतकरी होण्याचं स्वप्नं तसंच राहिलं - आमचं शेतावरचं प्रेम काही आटलं नाही.

अलिकडे बाबांनी संतूकाकांना ते शेत विकलं. मात्र कितीही झालं तरी ते शेत मला "आपलंच" वाटत राहणार - आणि कदाचित शेतासाठीही मी आपलाच.

दहा वर्षांनंतर गेलो तरीही विहिरीवर वाकलेलं ते चिंचेचं झाड, "या साली पाणी काय बराबर नाय पडलं बा" म्हणून हळहळेल कदाचित; पण म्हणून काही सुगरण पक्षी त्याच्या खोप्याची जागा तिथून हलवणार नाही. "अजित तू आला -- थोडं आटवलेलं दूध घेऊन जा, वाल खुडायला सांगू का?" असं संतूकाका म्हणणार हे नक्की. "आता द्राक्ष लावतो, फक्त खाल्ल्या अंगाला भात करतो" अशा प्रगतीचा सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यांत चमकतांना दिसेल.

"अहो काय सांगू? शाळेत असताना शाळा सोडून मीही शेतीच करायचं ठरवलं होतं!" असं मी बोलून जाईन -- आणि माझ्याबरोबर हसता हसता एखादा थेंब त्यांच्या डोळ्यांत दिसेलही कदाचित. "आता करायची का? तांबाडे लावू या साली?" त्यांच्या या मनापासून विचारलेल्या प्रश्नाला मी फक्त स्मित करीन की दुसरं काही उत्तर देईन हे आत्ताच कसं सांगू?

Sunday, November 16, 2008

अमेरीकेत गेल्यानंतर सगळ्यांत पहिली गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, कुठेही गेलं तरी आपण हॉलिवूडच्या चित्रपटात वावरतो आहोत असंच वाटतं. एकदा एका मित्राला हे बोलून दाखवलं तर तो म्हणाला, की "अरे त्यांच्या सिनेमांमधे इथे जसं आहे तसंच दाखवतात, त्यात काय एवढं!"

"त्यात काय एवढं॒? हं".

एकदा युटाहच्या ट्रिपला गेलो असतानाची गोष्ट: रात्रीचे साधारण अकरा वाजले होते आणि आम्ही आमच्या मुक्कामाच्या म्हणजे 'पेज' गावी पोचतच होतो. तास-दोन तासाच्या रात्रीच्या ड्रायव्हिंग नंतर जरासं थकायला झालेलंच होतं, त्यात मागे बसलेली सगळी गॅंग पेंगत होती. पॉवेल लेकच्या जवळ धरण-वजा एक पूल आहे. तिथे २५ मैलाची मर्यादा पाहिली आणि मी गाडीला आवरलं. पूल संपता-संपता वेग घेतला तर समोरच पोलिसांची गाडी दिसली. जरा सावध होऊन त्यांना पार केलं तर आरश्यात पोलिसमामांनीही गाडी बाहेर काढलेली दिसली. 'पोलीस... हा 'म्हैस'मधला पेशल उच्चार आठवतो न आठवतो तोच आमच्या आरशात निळे-पांढरे दिवे चमकायला लागले, सायरनही वाजतो आहे असा भास झाला. "अरे स्पीड वाढव, स्पीड वाढव. लिमिटपेक्षा इतकं हळू जाणं चुकीचं आहे," असं माझा मित्र म्हणेपर्यंत हि दिवेलागणी होऊन गेलेली. मग कसला स्पीड वाढव! उजवीकडे (इंडीकेटर देऊनच) गाडी बाजूला घेतली. आता काय होणार या विचारात मग बसून राहिलो. मोठ्या रुबाबात मग पोलीस-साहेब आले. काच खाली केल्यावर मस्त गूड इव्हिनिंग वगैरे म्हणाले. कागदपत्रं दाखवल्यावर मग मला बाहेर येऊन 'चल जरा कोप-यात' असं म्हणतो की काय असंही वाटलं. पण तसं काही झालं नाही. त्याच्या मागे मागे त्याच्या गाडीपर्यंत गेल्यावर तो म्हणाला, "अरे विशेष काही नाही. २५ मैलाची मर्यादा होती. तू जरा जास्तच जोरात चालला होतास. तिकिट देत नाहिये तुला, वॉर्निंग देऊन सोडून देतो आहे." "हं, सुटलो. आणि मला माझा मित्र अजून स्पीड वाढवायला सांगत होता!" मग पोलिसाबरोबर गप्पांचं सेशन झालं. काही म्हणा, अमेरीकन लोग भलतेच गप्पीष्ट. रात्री अकरा वाजता, ओस पडलेला कुठल्यातरी हायवे, ही काय, "काय जेवलात आज?" असं विचारण्याची जागा आहे?. पण काय करणार. सगळ्या गप्पा झाल्या, कुठे कामाला आहे, मूळचा देश कुठला, कुठल्या शाळेत शिकलो, माझ्या आवडत्या सरांचं आणि नावडत्या भाजीचं नाव काय, सगळं सांगून झालं. तोपर्यंत मग त्यानी तो वॉर्निंगचा कागद फाडला, गूड नाईट म्हणालो तेव्हा कुठे मग त्यानी मला जाऊ दिलं.

तर सांगायची गोष्ट काय, तर जेव्हा ते निळे-पांढरे दिवे दिसले आरशात तेव्हा अगदी म्हणजे अगदी हॉलीवूडच्या सिनेमात असल्यासारखं वाटलं. फक्त वेग १५० मैल नसून फक्त ३५-४० मैल होता! तो वॉर्निंगचा कागद अगदी जपून मी इकडे घेऊन आलो आहे. फ्रेम करून कुठे तरी लावावी असा विचार आहे, बघू या...

अमेरीकेबद्दल अशा माझ्या ब-याच कल्पना होत्या. प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्यावर त्यातल्या सगळ्याच काही ख-या नव्हत्या असं लक्षात आलं. मागे मलेशियाच्या छोट्या ट्रिपनंतर, "अच्छा! म्हणजे परदेशातले लोकही बाल्कनीत कपडे वाळत घालतात तर!" हे नवे ज्ञानकण आम्ही वेचले होते. अमेरीकेबद्दल, "तिथे म्हणजे बाहेरसुद्धा अगदी A/C त असल्यासारखं वाटतं म्हणे" अशी माझी काहिशी वेडगळ समजूत होती. तिथे गेल्यानंतर, ऍरीझोनाचा उन्हाळा सहन केल्यावर ती वेडी संकल्पना फक्त मनात ठेवण्याइतपत बरी आहे याची जाणीव झाली. 'तिकडे' जाऊन आलेल्यांबद्दल असं सारखं (टोचून) बोललं जातं की, "काय अमेरीकेला जाऊन आलात, आता काय फक्त पेप्सी आणि कोका-कोला पिणार तुम्ही. तिकडे पाणी मिळत नाही असं ऐकून आहोत आम्ही". ह्या तिरप्या बोलण्यालाही काही आधार नाही हेही कळलं. "वॉटर--नो आईस, प्लीज" असं म्हटलं की पाणी मिळतं हे आम्ही लगेचच शिकलो!

अशा काही कल्पना ख~या-खोट्या ठरवल्यानंतर काही नव्या गोष्टींचीही भर पडली. बेसबॉल या खेळात नेमकं काय करायचं असतं याची काहिही कल्पना नव्हती. परत येईपर्यंत वर्ल्ड सीरीज फायनलचे स्कोर बघण्यापर्यंत प्रगती झाली. तिच गोष्ट अमेरीकन फुटबॉल या खेळाची. लोकांकडून मिन्निआपोलीस, सॅन होजे, ऑस्टीन, सिऍटल, ऍटलांटा अशी शहरांची नावं एकामागून एक ऐकली जायची. मात्र ती सगळी अमेरीकेतली गावं आहेत, पण पूर्वेकडे की पश्चिमेकडे याचा भूगोलही शून्य होता. आता ब~याच रा्ज्यांच्या प्रमाणवेळांचीही चांगलीच माहिती झाली. डेमोक्रॅट की रिपब्लिकन या डाव्या-उजव्या विचारसरणीचाही बराच अभ्यास झाला. जाण्यापूर्वी यातही मला काहीच गती नव्हती!

सगळ्या रीतीभाती एकवेळ समजून घेता येतील, मात्र दुकानांमध्ये (विशेषतः कपडे किंवा बूटांच्या) पैसे देऊन झाल्यानंतर, "रीसीट बॅगमधे ठेवलेली आवडेल की तुमच्याकडे देऊ" असं विचारण्याची काय पद्धत आहे हे सात महिन्यांनंतरही मला उलगडलेलं नाही. "कुठेही ठेवा!!! काय फरक पडतोय? पैसे तर प्रचंड लावलेच ना!" असं पुणेरी उत्तर द्यावं असं ब~याच वेळा वाटूनही गेलं. पण उगीच संभाषण न वाढवता मी काढता पाय घ्यायचो. गप्पांमधे अडकलो, तर पुन्हा नावडत्या फळांची जंत्री म्हणून दाखवायला लागायची!

Saturday, November 08, 2008

पुढील दोन उता-यांत तुम्हांला साम्य दिसते आहे का? मला तरी तसे वाटते आहे. शेखर कपूरला कळवायला हवे! :)

Thursday, September 18, 2008

बेघर अर्थव्यवस्था

अमेरीकेची (आणि क्रमेणं जगाचीही?) आर्थिक घडी विस्कटण्यामागे अनिर्बंध-अमर्याद घरबांधणी हे मुख्य कारण असल्याचा निर्वाळा बुश प्रशासनाने दिल्याचं वाचलं. ही अशी घरघर लागलेली अर्थव्यवस्था कशी मार्गी लागणार अशा विचारात असताना, मला इतर भाषिक-सामाजिक गमतीदार प्रश्न समोर दिसू लागले आहेत---
  • अमेरीकेतली सामाजिक कारणांमुळे त्रस्त असलेली वृद्ध पिढी आता "कुणी घर घेता का घर?" असं विचारतील.
  • "एक बंगला बने न्यारा" या गाण्यावर सरकार बंदी आणणार (आणि कालांतराने "तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा" वरही).
  • जुगारात (याला गॅंबलिंग असा रोमॅंटीक प्रतिशब्द आहे) "House always wins" हा सिद्धांत आता खोटा ठरणार.
  • स्वतःचं घर सांभाळता येत नाही, चालले जग जिंकायला (ही "लक्ष्य" सिनेमानी लोकप्रिय केलेली) म्हण नुसती प्रसिद्ध नाही तर जगप्रसिद्ध होणार!
  • "हौसेला मोल नाही म्हणतात; पण आजच्या आर्थिक परीस्थितीत, "हौसांना" मोल नाही हेच खरं.
  • "Drinks on the house" अशा प्रकारच्या पार्ट्या आता कमी होणार.
  • अवघ्या जगाचं "माज"घर असलेल्या अमेरीकेला असा फटका बसलेला ऐकून काहींच्या चेह-यावर खुनशी स्मित उमलणार. अरे प्रेसिडेन्ट असशील स्वतःच्या घरचा असं म्हणायचीही सोय उरली नाही म्हणतात.
  • अमेरीकेबाहेरील प्रथितयश आर्थिक संस्थांना आता नफा झाल्यावर अमेरीकन कंपन्यांना हेवा वाटणं स्वाभाविक आहे. मात्र आता त्यांनी उगीचच टीका केली, तर "अरे जा, तुझ्याशी मला काही देणं-घेणं नाही. तुझ्या घरचं खातो की काय आम्ही" असं अभिमानानं उत्तर देण्याचा आत्मविश्वास आमच्या घरगुती कंपन्यांना नक्कीच मिळेल.
आणखी काही?

Tuesday, July 29, 2008

खादंती

नुकताच एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. "बाबा गनूश" इत्यादी मेन्यूही छान होता वाचायला दिलेला. तिथे गेल्यावर "व्हॉट इज हॉट" असं विचारायची हुक्की झाली, पण बाहेरची हवा (आणि वेट्रेस!) सोडल्यास गरम म्हणावं असं काही तिथे दिसेना.

अचानक एक "भयंकर" कॅटेगरीतलं संगीत (!) सुरू झालं. मित्राला म्हणालो, "हे फारच झालं--- This music sounds totally Greek to me!"

त्यावरून काही खाद्य-विनोद सुचले. ते ऐकून 'पकला' नाहीत तर कळवा!
  • एकच वांगं लागणा-या वांग्याच्या जातीला काय म्हणाल? "एक-प्लांट" (हा स्टार्टर समजा!). असं एगप्लांट खाऊन पोटात दुखलं नाही तरच मिळवली.
  • आता दोन कठीण प्रश्न:-
  • खूप जास्त (पण अगदी चवीनं) च्यूईंग गम चघळणा-याला काय म्हणाल? (अमेरीकन लोकांत हे फारच फॅड आहे): चावट.
  • ग्रीक (मेडेटेरियन) (प्र)देशातल्या पीटा ब्रेडबद्द्ल कदाचित तुम्हाला ठाऊक असेल-नसेल. हा एक चविष्ट ब्रेड असतो. खूप खपून बनवलेल्या पीटा ब्रेडला काय म्हणाल? - आटापीटा.
  • असं कुठल्या पेयाचं व्यसन आहे, जे नावानीच सांगत असूनही लोकांकडून सुटत नाही? (पुन्हा, अमेरीकन लोकांत हे फार दिसून येतं)- सोडा!

Friday, June 20, 2008

उन्हाळ्याची सुट्टी

झुकुझुकू अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहू या--- मामाच्या गावाला जाऊ या!
आगीन गाडीनं मामाच्या गावाला जायचा योग आमच्या लहानपणी कधीच आला नाही (आणि भविष्यात तरी येणार की नाही कोण जाणे). नाशिक-पुणे हा उन्हाळ्यातला प्रवास आई आणि बहिणीबरोबर नेहमीच बसने व्हायचा. आख्खा रस्ता अतिशय रुक्ष, त्यामुळे पळती झाडे बिडे पाहण्याचा योगही नाही! उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या पुण्याच्या आठवणी धुरांच्या रेषांप्रमाणे विरून जायच्या आत कुठेतरी उमटवून ठेवाव्यात म्हणून हा लेखन प्रपंच!

मंडईच्या दारात आमच्या आजोबांचा वाडा होता. तो अगदी लहानपणी. त्या घराच्या फारशा आठवणी नाहीत. एका मोठ्या हॉलवजा खोलीत उंच टांगलेल्या हंड्या (आणि त्यात लकलकणारा दिवा), वरती माडीवरच्या खोलीत अभ्यास करत बसलेला मामा, आत स्वयंपाकघरात आजीची चाललेली धावपळ, खाली आजोबांच्या वर्कशॉपमधले (हो, आमच्या आजोबांनी घरी अनेक यंत्र घेतलेली) लेथ, ड्रीलिंग मशीनचे ते अवाढव्य डाग, देवघरातले असंख्य देव, आणि खाली मंडईचा अविरत आवाज एवढंच काय ते आठवतंय. माझ्या आठवण्यासारख्या वयात घालवलेल्या सगळ्या सुट्ट्या त्या कोथरूडच्या घरात!

कोथरूडचं घरही आकाराच्या दृष्टीनं जरा अजबच. त्याचं कारणही तसंच खास. या घराच्या पहिल्या मजल्यावर आजोबांनी बॅडमिंटन कोर्ट बांधलेलं. त्या कोर्टाच्या खाली आमचं हे घर. घराचं नावही मस्तच: "खेळीया"! बाहेर ब-यापैकी बाग. नारळ, गुलाब, आंबा, पेरू इत्यादी जुजबी कलमं. घराच्या अगदी समोर एक भला मोठा ट्रान्स्फॉर्मर! बॅडमिंटन कोर्टाकडे जाणा-या जिन्याच्या बाजूला चढलेले जाई की जुईचे वेल, आणि घराच्या दाराजवळचा चंद्रहास. लहानपणच्या आठवणी अशाचा जिन्याला धरून चढणा-या वेलासारख्या असाव्यात!

कोणी 'करवंद' म्हणालं, की त्या काळ्या छोट्याश्या आंबट-तुरट-गोड फळाऐवजी मला 'ले काSSSळी मैना--- कोकणची मैना" अशी करवंदंवालीची जोरदार हाकच ऐकू येते. पुणं सोडून कुठेही मी अशी हाक ऐकलेली नाही. नाशकाची द्राक्ष इतकी प्रसिद्ध, पण तिथे कोणीही अशी हाक टाकून द्राक्ष विकायला येत नाही! वर्षानुवर्षं मी ही हाक ऐकलेली. एकंदरीतच आजोळी खाण्यापिण्याची ऐश! आमची आजी सुगरण. आणि आमचे आजोबा खवय्ये! घरी न विचारताच खवा घेऊन यायचे आणि मग आमच्या आजी-आजोबांमध्ये भांडण व्ह्यायचं. "अहो.... खवा आणलाय," ला "अहो पण मागच्याच आठवड्यात झालेत ना गुलाबजाम" असा जवाब मिळायचा. आमची चैन, दुसरं काय! आमचे आजोबा स्वतः जिलब्या करायचे. स्वेटर विणायच्या सुईने तयार जिलब्या तेलातून पाकात सोडण्याच्या कलेचं प्रात्यक्षिक त्यांच्याकडूनच पहावं. त्याआधी मग मुद्दाम मोठा नारळ आणून त्याच्या करवंटीला भोक पाडणे इत्यादी पूर्वतयारी झालेली असायची. जेवायला बसल्यावर, "हाण तू" असं परमीट मिळालेलं असायचं. खव्याच्या पोळ्या ही आमच्या आजीची खास रेसीपी. लाडक्या नातवा-नातीसाठी आम्ही "अगं असू दे, असू दे" म्हणत असूनही पोळीच्या अगोड कडा ती काढून द्यायची. भेळ, पॉटचं आईस्क्रीम, आम्रखंड (आजोबांकडे उडप्याकडे असतं तसं चक्का रगडण्याचं मशीन होतं), कैरीचा भात (हा प्रकार मला बिल्कूल आवडत नाही), अशा पाककृती ठरलेल्या. या व्यतिरीक्त माझा एक अत्यंत नावडता प्रकार म्हणजे गव्हाचा चीक. कुरडया नामक दोन मिनिटांमध्ये संपणा-या तळकट पदार्थासाठी इतका व्याप का करावा असं माझं मत आहे. शिवाय त्या एक-दोन दिवसांमध्ये स्वयंपाकघरात नाक ठेवणं अशक्य होऊन बसतं. पापडाचा कार्यक्रमही मोजून व्ह्यायचा दर वर्षी. पोह्याचे, नागलीचे आणि कसले कसले पापड व्ह्यायचे. त्याचं पीठ तेल लावून सही लागतं, ते खायला मजा यायची. पण पापडाची चुलतबहीण कुरडई मात्र अंत बघायची. हे सगळं झालं घरी. याशिवाय मग सारस बागेतली भेळ, तुळशीबागेजवळचे कावरे आईस्क्रीम, बाजीराव रोडवरचं मुरलीधर रसवंतीगृह, अशी सगळी चैन असायची ती वेगळीच! त्यासाठी आई आणि मावशीबरोबर साड्यांच्या दुकानांतून रपेट करायला(ही) त्यामुळे काही वाटायचं नाही.

सुट्टीत खाणं-पिणं आणि खेळणं इतकाच उद्योग असलेल्या त्या वयात पुण्याच्या आमच्या घरी पुष्कळ उद्योग होते. आमच्या आजी-आजोबांच्या लग्नात त्यांना भेटवस्तू म्हणून पत्याचे तीन-चार डझन कॅट मिळाले होते. (यामागचं प्रयोजन काय ते विचारू नका, मलाही ठाऊक नाहिये!). मग प्रत्येक सुट्टीत एक नवीन कॅट नक्कीच बाहेर काढला जाई. दुपारी आमरस वगैरेचं जेवण झाल्यानंतर आजीबरोबर पत्त्यांचा डाव ठरलेला असायचा. आमचा खेळ पाहत आजोबा बसल्याबसल्या डुलक्या काढायचे. आम्ही कितीही म्हटलं तरी आत जाऊन आडवे काही व्ह्यायचे नाहीत! पत्त्यांचा कंटाळा आल्यावर मग आजी 'सकाळ'मधल्या सुटीच्या पानातलं काहिसं वाचून दाखवायची. मग सावकाश आम्ही सगळेच आडवे व्ह्यायचो. बाहेर अर्थातच सूर्य तळपत असायचा.

लहानपणापासून मी म्हणे बाबा-वेडा आहे. पुण्याला जायच्या वेळी म्हणे अगदी लहानपणी मी चक्कं रडायचो. सुट्टीच्या शेवटी शेवटी बाबा घ्यायला आले की आमची दोन इंच उंची वाढलेली असायची! मी कधीकधी बाबांना पोस्टकार्ड लिहायचो. त्यावेळी फोनचंही एवढं काही नव्हतं... आठवड्यातून एकदा असं म्हटलं तरी पुण्याच्या सुट्टीत एक-दोनदाच नाशिकला फोन! त्यापैकी एक रीझल्ट कळवायला. मग त्याबद्द्ल आईस्क्रीम पार्टी असं काय काय सगळं ह्यायचं.

शि-यातल्या बेदाण्यांसारख्या या सगळ्या छोट्या-छोट्या आठवणी.

उशा घेऊन मावशीशी केलेली मारामारी असो किंवा भर उन्हाळ्यात मच्छरदाणी नको म्हणून मी केलेला आणि आजोबांनी मोडून काढलेला हट्ट; तुळशीबागेतल्या त्या झाडाजवळचा हळदी-कुंकवाचा वास असो किंवा पी.एम.टी. च्या रंगीबेरंगी तिकिटांचं अप्रूप! पोहायला जायचं नाही म्हणून अडून बसलो ते असो आणि आजोबा दुखरा गुडघा असूनही माझ्याबरोबर बॅडमिंटन खेळले त्याचा आनंद! नाशिकच्या आजीनं मी पुण्याला असताना आंतर्देशीय पत्रातून पाठवलेली, "अजित कुठाय? अजित कुठाय?" कविता! "अत्तर बित्तर मी काही लावत नाही, मला इंजिन ऑइल आणि ग्रीसचा वासच आवडतो" असं आमच्या आजोबांनी अवस्थी अत्तरवाल्यांना सांगितलेल्याचं आठवल्यावर हसू फुटतं.

सगळं कधीकधी असं आठवून जातं, आणि मग आघात करतं ते वास्तव-- पुण्याचे आजी-आजोबा आता नाहीत. आईच्या कपाटात आजी-आजोबांचा एक छान फोटो आहे, त्यातून ते भेटतात अजूनही. आमचे आजोबा अत्यंत सुदृढ-सशक्त होते, त्यांचे योगासनांचे-मयूरासनाचे फोटो पाहून थक्क व्हायचो. "व्यायाम करायचा ज्या दिवशी थांबवशील त्या दिवशी मी समजेन की तू आजोबांना विसरलास," हे आईचं वाक्यं मनात कायमचं कोरलं गेलेलं. आपल्या 'जीन्स'मध्ये आपला स्वभावही लिहिलेला असावा. माझ्यातच मला माझे आजी-आजोबा सापडतात कधीकधी. व्यायामाचा-खेळाचा कंटाळा आलेला असतो कधीतरी, पण आजोबा सांगतात खेळायला पाहिजे, तब्येत उत्तम ठेवायला हवी! कधीकधी आमच्या आजीसारखाच मी मृदूही होऊन जातो, तिच्या खव्याच्या पोळीतल्या मायेची चव आठवायला मग खरी खव्याची पोळी लागतच नाही. माझा देवावर एवढा विश्वास नाही, पण आमचे आजी-आजोबा माझ्यावर लक्ष ठेवून आहेत, माझ्या चांगल्या-वाईट वागण्याचं त्यांना आनंद-दुःख होतं यावर माझा विश्वास आहे!

असो.

पूर्वीचं पुणं राहिलं नाही म्हणतात, पुण्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं म्हणाल तर याहून 'खरं' सत्य दुसरं ते कोणतं?

Sunday, April 27, 2008

काय वाट्टेल ते होईल!

काल की परवा IPL च्या मॅचनंतर पराभवाचं शल्य (टोचायला नको त्या ठिकाणी) टोचल्यामुळे रागाच्या भरात कर्णधार हरभजन सिंगने आपला हुकुमी गोलंदाज शांता श्रीशांतच्या श्रीमुखात भडकवली. चारचौघात आपल्या कर्णधाराने आपले गाल लाल चुटूक केल्याचं टिचभर दुःख अनावर झाल्याने श्रीशांतने टिव्हीवरच भोकाड पसरले.

या बातम्यांमध्ये ख-या बातमीपेक्षा त्या बातमीत वापरलेली मराठी जास्त मनोरंजक असते! माझ्या डोळ्यांनी श्रीशांतचे अश्रू टीपले नाहीत आणि हरभजनसिंगला कर्णधार कोणी केला म्हणून ढाळलेही नाहीत. मी वेचला तो अनुप्रास! कर्णधाराचा मुकुट काटेरी खरा!
---

आज अंतुशेट असते तर, "परवा वर्च्या आळीतली पोरं खेळत होती क्रिकेट. झाल्या मा-यामा-या मॅच संपल्यानंतर. व्हायच्याच, आजकालची वाह्यात कार्टीच ती. पण म्हणून, छापाल काय ही बातमी उद्याच्या पेप्रात?" असं म्हणाले असते!
---